मुंबई, दि. ६ ऑक्टोबर : भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
ना. आठवले म्हणाले की, “सरन्यायाधीशांवरील हल्ला हा केवळ एका व्यक्तीवरील नव्हे तर भारताच्या संविधानावर आणि लोकशाहीच्या आत्म्यावर झालेला हल्ला आहे. न्यायप्रिय प्रत्येक नागरिकावरील हा प्रहार आहे.”
त्यांनी मागणी केली की, “हल्लेखोरावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी.”
आठवले यांनी स्पष्ट केले की, न्यायपालिका ही लोकशाहीचा “प्राण” आहे आणि सरन्यायाधीशांवरील हल्ला म्हणजे संविधान, न्यायव्यवस्था आणि समतेच्या मूल्यांवर आघात होय.
ना. आठवले म्हणाले की, “महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चातुर्वर्णातून आलेला जातीभेद, वर्णभेद आणि सामाजिक असमानता संविधानातून नष्ट केली. परंतु काहींच्या मनातून आजही जातीभेद व भेदभाव गेलेले नाहीत. त्याच जातीवादी विचारसरणीतून हा निंदनीय हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.”
शेवटी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला आवाहन केले की, “सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा प्रयत्न हा राष्ट्रद्रोह ठरवून आरोपींवर तातडीने कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी.”
No comments:
Post a Comment