*बारामतीत पवारांच्या सत्तेला पहिली ठेच लागली का?*
*प्रतिनिधी-: भीमराव कांबळे*
बारामती -: लोकजागृती भूमी दि-:२५डिसेंबर २५-: नगरपालिका निवडणूक म्हटली की मतदार पक्षाचं चिन्ह पाहतो, ही जुनी समजूत बारामतीच्या निवडणुकीत मोडीत निघाली आहे का? यावेळी मतदाराने पक्ष नव्हे, तर माणूस पाहून मतदान केल्याचं चित्र समोर आलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो.
महाराष्ट्राचंच नव्हे, तर देशाचं राजकारण ज्या बारामतीतून फिरतं, पवारांचं ‘पॉवर हाऊस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातच सत्ताधारी राजकारणाला पहिल्यांदाच जोरदार धक्का बसला आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर पवार कुटुंबातील फूट उघडपणे समोर आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असा थेट सामना होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शरद पवार गट अपेक्षेप्रमाणे आक्रमक दिसला नाही, असं म्हणावं लागेल का? ठराविक जागांवरच लढत देत त्यांनी सावध रणनीती स्वीकारली आणि उर्वरित मैदान इतर पक्ष व अपक्षांसाठी खुले राहिलं. याचा थेट फायदा व्यक्तीप्रधान राजकारणाला झाला का, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सहा विरोधक नगरपालिकेत पोहोचले. हे चित्र सत्ताधाऱ्यांसाठी इशाराच मानायचं का?
🔹 प्रभाग ५ : रासपचा धक्का — संघटन अपयश?
प्रभाग क्रमांक ५ मध्ये रासपच्या उमेदवाराचा विजय राष्ट्रवादीसाठी धोक्याचा इशारा आहे का? येथे दिग्गज नावांचा पराभव होणं म्हणजे केवळ स्थानिक नाराजी की संघटनात्मक अपयशाचं प्रतीक, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
🔹 प्रभाग २० : ‘बाहेरचा’ उमेदवार की चुकीचा निर्णय?
प्रभाग २० मध्ये पक्षाने दिलेला “बाहेरचा” उमेदवार स्थानिकांना न रुचल्याने अपक्ष उमेदवाराने राष्ट्रवादीच्या दिग्गजाला छातीठोक पराभूत केलं. हा पराभव चुकीच्या उमेदवार निवडीचा परिणाम होता का?
🔹 प्रभाग १३ : चिन्ह हरलं, व्यक्ती जिंकली?
प्रभाग १३ मध्ये तुतारी चिन्हावरील उमेदवाराचा विजय हा स्पष्ट संदेश देतो का — चिन्ह नव्हे, व्यक्ती महत्त्वाची? हा इशारा पक्षाच्या धोरणकर्त्यांनी गांभीर्याने घ्यायला हवा का?
🔹 प्रभाग १५ : नवख्याने दिग्गजांना धक्का — रणनीती फसली?
संपूर्ण बारामतीत सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेला प्रभाग १५. पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने पवार समर्थक कुटुंबातील दिग्गज उमेदवारालाच पराभवाची धूळ चारली. हा पराभव व्यक्तीचा होता की पक्षाच्या रणनीतीचा, असा सवाल उपस्थित होतो.
🔹 प्रभाग १४ : संघर्ष संपला की सत्तेला धक्का?
कित्येक वर्षांपासून चालू असलेल्या संघर्षाला प्रभाग १४ मध्ये विरोधकांच्या विजयाने पूर्णविराम मिळाला. हा निकाल राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानायची का?
🔹 ‘किंगमेकर’ बॅनर आणि अंतर्गत खेळी?
निवडणुकीनंतर अपक्ष विजेत्यांचे “किंगमेकर” म्हणून बॅनर झळकले. विशेष म्हणजे हे बॅनर लावणारे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते, माजी पदाधिकारी आणि उपनगराध्यक्षपदापर्यंत पोहोचलेले चेहरे आहेत. मग अपक्षांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठिंबा दिला गेला होता का, असा संशय व्यक्त होतो.
तांदळवाडी प्रभाग क्रमांक १ — जिथे शहराध्यक्ष पद आहे — इथेही उमेदवारांना प्रचंड मेहनतीनंतर निसटता विजय मिळाला. हा निकाल आत्मपरीक्षणाची गरज अधोरेखित करत नाही का?
तसंच प्रभाग क्रमांक ८ मध्ये युवक अध्यक्ष व माजी नगरसेवक एवढी मोठी पदं असूनही नवख्या उमेदवाराला सुमारे ७५४ मतं मिळणं काय संकेत देतं? इथेही पक्षाने आत्मपरीक्षण करायला हवं का?
ही संपूर्ण आकडेवारीच सांगते की काही प्रभागांमध्ये पक्षाची पकड पूर्णपणे सुटली आहे का?
आजही “बारामतीचा विकास म्हणजे अजित पवार आणि अजित पवार म्हणजे विकास” हे समीकरण जनमानसात आहे. मात्र या निवडणुकीत काही ठराविक प्रभागांमध्ये हे समीकरण फेल ठरल्याचं दिसून आलं का?
विशेषतः पाटस रोड परिसर — नेहमी व्यक्तीकडे पाहून मतदान करणारा भाग. इथे संघटन वाढवण्याची सुवर्णसंधी पक्षाने गमावली का?
याचाच कळस म्हणजे प्रभाग क्रमांक १०. हा प्रभाग ‘जॉईंट किलर’ ठरला का? येथे पक्षाच्या महिला शहराध्यक्षांना दारुण पराभव स्वीकारावा लागला. हा पराभव मतांचा होता की संघटनात्मक अपयशाचा आरसा?
खरे प्रश्न आता थेट उभे राहतात —
👉 या प्रभागात सचिन जगदाळे यांना उमेदवारी मिळाली असती, तर निकाल वेगळा लागला असता का?
👉 तिकीट न मिळाल्याने कार्यकर्त्यांनी विरोधात काम केलं की मुद्दाम शांत बसून पक्षाला धडा शिकवला?
👉 की पक्षानेच योग्य माणसाऐवजी चुकीची निवड केली?
असाच प्रकार अनेक प्रभागांमध्ये दिसून आला. कुठे अपक्ष जिंकले, कुठे वेगळ्या चिन्हावर उमेदवार निवडून आले. हे संकेत पक्षाची ताकद असूनही ती योग्य वापरली गेली नाही, असं दर्शवत नाहीत का?
ही निवडणूक बारामतीच्या राजकारणात एक स्पष्ट इशारा देऊन गेली आहे —
फक्त सत्ता, फक्त नाव आणि फक्त पक्ष पुरेसा आहे का, की आता जमिनीवरचा माणूसच निर्णायक ठरणार आहे?
पवारांचं वर्चस्व अजूनही अबाधित आहे, मात्र या निकालाने हेही स्पष्ट केलं आहे की बारामतीत नाराजीचा आवाज आता दबलेला राहिलेला नाही. वेळीच आत्मपरीक्षण झालं नाही, तर ही ठेच भविष्यात मोठ्या हादऱ्याचं रूप घेईल का, हा प्रश्न कायम आहे.
No comments:
Post a Comment